धबधबे, कास पठार, महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील स्थळांचा समावेश
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जिल्ह्यात दाखल होत असून, संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी २० जूनपासून १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत विविध पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील अनेक धबधबे, कास पठार, महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील धरणे व निसर्गस्थळांवर पर्यटकांसाठी काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
बंदी घालण्यात आलेली ठिकाणे:
- अजिंक्यतारा किल्ला
- ठोसेघर धबधबा
- केळवली-सांडवली धबधबा
- वजराई धबधबा
- कास पुष्प पठार
- एकीव धबधबा
- कास तलाव
- बामणोली
- पचकुंड धबधबा
- सडावाघापूर उलटा धबधबा
- उरुल घाट शिव मंदिर धबधबा
- रुद्रेश्वर देवालय धबधबा
- ओझर्डे धबधबा
- घाटमाथा धबधबा
- लिंगमळा धबधबा
- महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील प्रमुख धरणे व घाट परिसर
असे असतील निर्बंध
- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे यावर बंदी- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे याला बंदी- पावसामुळे धोकादायक ठिकाणी धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी आणि चित्रीकरण करण्याला बंदी - धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे याला परवानगी नाही.- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवता येणार नाही.- सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, असभ्य वर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई- सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा, डीजे वाजविणे यावर बंदी.
पर्यटकांची सुरक्षितता
दरवर्षी पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, धबधब्यांतील पाण्याचा वेग, धोकादायक दऱ्या आणि निसरडे रस्ते हे जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे निर्बंध अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाच्या या सूचनांचा आदर करावा व पावसाळी पर्यटनाचा आनंद सुरक्षितपणे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.