युवकांनी अन्यायाविरोधात लढा उभारला पाहिजे : इंद्रजित देशमुख

श्री संतकृपा अभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात



सुप्रसिद्ध विचारवंत इंद्रजित देशमुख यांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव प्रसून जोहरी, संतकृपा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.स्वानंद  कुलकर्णी समवेत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर मान्यवर.
घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
“आजच्या तरुणांनी जागतिक बाजारपेठेत सक्षमपणे उभे राहावे. अन्यायाच्या विरोधात निषेध नोंदवत जनजागृती करावी आणि अत्याचारांविरोधात लढा उभारावा. अशा जिगरबाज तरुणांच्या जोरावरच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदर्श नागरिक घडू शकतील,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व वक्ते इंद्रजित देशमुख यांनी केले.
घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी सर होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकर, डी. फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील, तसेच इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मनीषा हरळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना प्रेरित करताना इंद्रजित देशमुख म्हणाले, "युवकांनी सकारात्मक आणि विधायक कृतीवर भर द्यावा. देशाला एकत्र जोडणारा, माणुसकीची प्रेरणा देणारा तरुण तयार होणे गरजेचे आहे. आज भारताला अशाच जबाबदार आणि कर्तव्यदक्ष तरुणांची आवश्यकता आहे."

संस्थेचे सचिव प्रसून जोहरी सर यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नेहमी अपडेट राहण्याचा सल्ला दिला. तसेच महाविद्यालयाने NAAC B+ मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल वर्षभर परिश्रम घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. यामध्ये वर्षभर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच NAAC B+ मानांकन प्राप्त करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या विद्यार्थी आणि मॅनेजमेंटचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच संस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्नेहसंमेलनाचा मुख्य आकर्षण ठरला "स्पंदन 2K25" हा सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय संस्थेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्राध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी मानले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका पूनम यादव व त्यांच्या संपूर्ण टीमसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.