कुंभारगाव (ता. पाटण) येथील कळंत्रेवाडी शिवारातील अजित पाटील यांच्या आंब्याच्या रानालगत असलेल्या बरकाड शेतातील उभ्या ऊस फडाला शुक्रवारी (दि. १७ जानेवारी) सायंकाळी सात वाजता भीषण आग लागली. या आगीत सुमारे दोन एकर ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन शनिवारी सकाळी तळमावले येथील महावितरणचे सेक्शन ऑफिसर धनंजय शेंडे, सिनियर सुपरवायझर दिलीप घोलप, वायरमन नटराज कांबळे आणि पोलिस पाटील अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आगीला विद्युत पुरवठ्यातील शॉर्टसर्किट कारणीभूत ठरले आहे का, याचा तपास सुरू आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब गायकवाड व सहाय्यक हणमंत कारंडे यांनी केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
उभा ऊस जळाल्यामुळे अजित पाटील यांनी संबंधित साखर कारखान्याला तातडीने उसाची तोडणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. रयत साखर कारखान्याने या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने तोडणीची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
आगीच्या या घटनेने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून प्रशासनाकडून या नुकसान भरपाईसाठी तातडीने उपाययोजना होण्याची मागणी होत आहे.