श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या 1169 विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषण व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा.


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री मळाई देवी शिक्षण संस्था मलकापूर व विज्ञान प्रबोधिनी कराड यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आ.च.विद्यालय मलकापूर च्या प्रांगणात 1169 विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

    श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव,शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या संकल्पनेतून गेली सोळा वर्षे पासून पर्यावरण पूरक उपक्रम राबवला जात आहे.याही वर्षी फटाके मुक्त व प्रदूषण विरहित दीपावली साजरी करण्याचे सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन केले.श्री मळाई ग्रुप विविधांगी समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असते.

   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले, इको-फ्रेंडली पद्धतीने दिवाळी साजरी करणे केवळ पर्यावरणासाठीच फायदेशीर नाही तर सणाची भावना देखील समृद्ध करते, त्यामुळे ती पर्यावरणपूरक दिवाळी बनते. शाश्वत पद्धतींचा स्वीकार करून आपण इको-फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करू शकतो हे जाणून घेऊन, आपण पृथ्वीचा मान ठेवणारी आणि भावी पिढ्यांसाठी सकारात्मक वारसा देणारी आनंदमय आणि अर्थपूर्ण दिवाळी घडवू शकतो. आपण सर्वांनी इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करून निरोगी आणि हरित जगासाठी हातभार लावण्याची प्रतिज्ञा करूया असे आवाहन त्यांनी केले.फटाके मुक्त व प्रदूषण मुक्त दीपावली या विषयी बोलताना पुढे ते म्हणाले, जीवनाचा आनंद घेण्यासाठी विचारांच्या देवाणघेवाणीतून प्रदूषणाने माणसावर होणारे आघात या बाबत अधिक विचार समाज बांधवांमध्ये व्हावा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.

       याप्रसंगी विज्ञान प्रबोधिनीचे सहसचिव एम.व्ही.कांबळे यांनी विद्यार्थ्यांना फटाके मुक्त व प्रदूषण मुक्त दीपावलीची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्यध्यापक श्री थोरात ए.बी., पर्यवेक्षक श्री बुरुंगले बी.जी., सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.तसेच विद्यालयातील शिक्षकांच्या उपस्थितीत पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त दीपावली पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तशी शपथ सर्वांनी घेतली.

   पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त दीपावली पत्रकाचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या शेजाऱ्यांना,ओळखीच्या माणसांना पत्रकाच्या माध्यमातून आजच्या प्रदूषणाचे रौद्र रूप समजावून द्यावे अशा सूचना सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

   प्रास्ताविकपर मार्गदर्शनात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ए.एस.कुंभार यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण,प्रदूषणाचे प्रकार त्याचे समाजावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे आभार बी.जी.बुरुंगले यांनी मानले.