डाकेवाडी परिसरात कोळपणीची लगबग


शिवारामध्ये कोळपणी करताना शेतकरी महिला.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
यंदा मृगाच्या पावसाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नसल्याने किंवा तसे वातावरण दिसत नसल्याने सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे जीवावर धोंडा ठेवून येथील शेतकरी वर्ग पेरणी करत असतात. याही वेळी पावसाची चिन्हे नसतानादेखील येथील लोकांनी धुळवाफेवरील पेरणी केली आहे. यामध्ये भुईमूग, भात, सोयाबीन, मका इ. पीके पेरुन घेतली. सुमारे 80 टक्के पेरणी लोकांनी या काळात पूर्ण केली.

साधारणपणे आठवडाभरापासून पिकांच्या गरजेपुरता पाऊस येथे पडत असल्याने पिके चांगली आली आहेत. पीके उगवण्यास पोषक असे वातावरण तयार झाले. सलग पाऊस पडल्यानंतर कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शिवारात कोळपणीची एकच हातघाई उसळलेली दिसून येते. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे त्यांनी देखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड करत आहेत.

ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी. परंतू सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पीकामध्ये कोळपू शकतो. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने लोक पीके कोळपत असल्याचे दिसत आहे.

सध्या पीके कोळपण्यासाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपल्यामुळे पुढे मोठया प्रमाणात येणाऱ्या तणाला प्रतिबंध घालता येतो. डाकेवाडी परिसरातील शिवारांमध्ये सध्या कोळपणीची एकच धांदल चालू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या विभागात जास्त पाऊस असतो. त्यामुळे बहुतांशी लोक भाताचे पीक

घेतात. हे पीक करताना लावणीची पध्दत वापरली जाते. लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी बी टाकले जाते. त्यानंतर संबंधित वावरामध्ये नांगरले जाते. हे सुध्दा काम सध्या सुरु आहे. लावणीच्या पध्दतीमुळे शेतातील तण कमी होते तसेच पीकाचे उत्पादन देखील जास्त येते. यामुळे अशा पध्दतीचे नांगरण्याचे काम सुध्दा मोठया प्रमाणात सुरु आहे.

______________________________________

एकंदरित संपूर्ण शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे सर्व लोक कामात व्यस्त आहेत. पाऊस उघडल्यामुळे शिवारात सध्या एकच हातघाई सुरु आहे. कोळपणीच्या माध्यमातून पिकातील जास्तीत जास्त तण काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे भांगलणी करताना जास्त त्रास होत नाही. अजून एकदा कोळपणी झाली तर पीक चांगल्या पध्दतीने येण्यास मदत होईल.

- आनंदा घाडगे, शेतकरी

______________________________________