माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी; कराड पोलिस अलर्ट.


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आज ईमेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी योग्य कारवाई करू असे म्हंटले होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी म्हंटले होते की, “संभाजी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रपित्याबद्दल निंदापूर्वक वक्तव्य केलं आहे. अशाप्रकारे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. हा माणूस हे काम आज करत नाही तर गेल्या अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. आता त्यांच्या या वक्तव्याची त्वरित दखल घेण्यात यावी.” जर संभाजी भिडे हा व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल अशाप्रकारचं विधान करत असेल तर तो बाहेर कसा फिरू शकतो? असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाण सभागृहात आक्रमक झाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभेत विरोधक आजून आक्रमक झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पृथ्वीराज बाबांच्या या मागणीची दखल घेऊन, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. परंतु एरवी शांत संयमी असणारे पृथ्वीराज बाबा प्रथमच भिडे प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. 

दरम्यान, आ. पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञातांकडून ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते? 

मंगळवारी अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना, “महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत” असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे.