ढेबेवाडी विभागातील विविध ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,व सदस्यांचा सारंगबाबा यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
महिंद ता.पाटण येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी सारंगबाब पाटील,सरपंच सौ.नंदाताई शेडगे व मान्यवर
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि ग्रामीण विभागाच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयांची कामे झालीआहेत आपल्या प्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा व भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन पक्ष व आपल्या नेत्याला ताकद देण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सारंग पाटील (बाबा) यांनी केले.
महिंद ता.पाटण येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या श्रीकृष्ण मंदिरा शेजारच्या ओढ्याला संरक्षक भिंत बांधकाम तसेच कारळे ता.पाटण येथील जल जीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेसह बौद्ध वस्ती ते पोकळेवाडी रस्त्याचे खडीकरण ,डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अशा विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी आवाहन केले.
यावेळी पाटणचे माजी उपसभापती प्रतापराव देसाई, रघुनाथ जाधव,(तात्या) ढेबेवाडी सरपंच सौ.रूपालीताई पाटील, उपसरपंच अभिजीत कडव, आत्माराम कदम, डाॅ.शिवाजी पवार, सचिन जाधव, पोपटराव खेडेकर, सणबुरचे माजी सरपंच संदीप जाधव,कारळ्याचे सरपंच महेश साळुंखे,उपसरपंच केशव साळुंखे, सुनील मोझर, रामभाऊ साळुंखे,सदाभाऊ साळुंखे, महंतराज बिडकर,महिंदच्या सरपंच सौ. नंदाताई शेडगे, सूर्यकांत बिडकर, सुनील शेडगे, भगवान साळुंखे, भगवान गोसावी, युवराज गोसावी, उत्तम जाधव, सणबूरचे सरपंच विशाल जाधव, उपसरपंच किरण जाधव, मत्रेवाडीचे उपसरपंच आनंदा मत्रे, तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना सारंग पाटील म्हणाले सत्ता आली की ताकद येते सत्तेत आलेली माणसं आर्थिक स्तोत्र वापरून राजकारण करतात परंतु सत्तेतील माणसाकडे जनते साठी वेळ कमी असतो, आपणाकडे जनते साठी वेळ आहे. खासदारांच्या माध्यमातून ढेबेवाडी विभागासह तालुक्यात कोट्यावधी रूपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत ही विकास कामे घेऊनच आपण जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे.
तालुक्याचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मागे ताकत उभी करायची असेल तर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा. तालुक्यात राष्ट्रवादीचे मोठे जाळेआहे पण रात्र धोक्याची आहे. गाफील राहून चालणार नाही ॲक्शन मोडमध्ये येऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्यावरच्या नाराजी मुळे गैरसमजातून दूर गेलेल्यांना पुन्हा प्रेमाने जवळ करा यासाठी आपला ईगो दूर ठेवा असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.