तर महाराष्ट्र पेटून उठेल, शंभुराज देसाई भडकले; कुणाला दिला हा इशारा?

 

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी अजित पवार यांच्यावर टीका सुरू केली आहे. दादा आधी बोलले असते तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आधीच उत्तर दिलं‌ असतं. संभाजी महाराजांना धर्मवीर हे नाव आज नाही देण्यात आलेलं. त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी बलिदान दिलं. त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हटलं जातं, असं सांगतानाच अजितदादांचं म्हणणं म्हणजे दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं आहे. याप्रकरणाने महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

शंभुराज देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांवर टीका केली. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना बऱ्याच आमदार आणि माजी आमदारांना सुरक्षा देण्यता आली होती. जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवाला धोका असतो तेव्हा त्याची माहिती घेऊनच त्याला सुरक्षा यंत्रणा पुरवली जाते, असं शंभुराज देसाई यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नागपूरला कधी दोन दिवसासाठी अधिवेशन घेतलं नाही. उद्धव ठाकरे कधी नागपूरला आले नाही. आम्ही मात्र दोन आठवडे अधिवेशन चालवलं. कोणताही वेळ न वाया घालवता आम्ही अधिवेशन पार पाडलं, असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही सभागृहात असायचो. ठाकरे सेना शिल्लक आहे की नाही माहीत नाही. कारण त्यांची सभागृहात उपस्थिती नसायची. ते फक्त मीडियासमोर येऊन तोंड वाजवायचे. केवळ सत्ताधारी पक्षाला अडचणीत कसं आणता येईल एवढंच भास्कर जाधव पाहत होते. त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचं हा प्रश्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

आम्हालाही खूप बोलता येईल. पण आम्ही बोलत नाही. 2024च्या निवडणुकीत काय ते समजेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही उठवा केला. बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही करत आहोत. आम्ही प्रभावीपणे सरकार चालवण्याचं काम करत आहोत.

राज्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहोत. आम्ही शांत आहोत. तोपर्यंत आमचा अंत पाहू नका. आम्ही व्यक्त झालो तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशाराच त्यांनी दिला.