कृषी व ड्रीम फाउंडेशनतर्फे विजय काळेंचा सन्मान.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कृषी विभाग महाराष्ट्र शासन व ड्रीम फाउंडेशन सातारा यांच्या वतीने सेंद्रिय शेतीची चळवळ अधिकाधिक गतिमान होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असलेले मालदन (ता. पाटण) गावचे युवा उद्योजक विजय पतंगराव काळे यांचा सन्मान केला. औंध येथे हा कार्यक्रम झाला.

विजय काळे यांनी बीएस्सी अॅग्रीची पदवी संपादन करून नोकरी न करता शेतीविषयक ज्ञानाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विषमुक्त सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत, तसेच अन्य उत्पादनांचा निर्मिती उद्योग मालदनला सुरू करून ते यशस्वी उद्योजक बनले आहेत.

सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी राहिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाच्या कृषी विभाग व साताऱ्यातील ड्रीम फाउंडेशनतर्फे औंध येथे आयोजित युवा शेतकरी मार्गदर्शन व प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळ्यात सेंद्रिय शेती, गांडूळखत प्रकल्प व सेंद्रिय मसाले गूळ निर्मितीबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, विभागीय कृषी सरसंचालक बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. काळे यांच्यासह आजोबा वामनराव जाधव, आजी शारदा जाधव व कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.