सत्यजितसिंह कोण ? तर तालुक्यातील निष्क्रिय नेतृत्व म्हणून जनतेने दोन वेळा नाकारलेल्यांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा प्रतिसवाल.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्वकर्तृत्व असल्याने राज्यात मला चांगलेच ओळखले जाते पण दुसऱ्याच्या ओळखीची काळजी करणाऱ्यांनी आपली ओळख नेमकी कुठे आहे हे अगोदर तपासून घ्या.आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये सलग दोन वेळा मोठया फरकाने आस्मान दाखवले आहे, याचे भान सत्यतिसिंह यांनी ठेवावे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने ज्या निष्क्रिय नेतृत्वाला मोठया फरकाने घरी बसविले आहे, असा प्रतिसवाल करत ज्या गद्दारीची भाषा आपल्या तोंडून आता येत आहे मग ज्यावेळी आपले नेते यांनी काँग्रेसमधून बंडाळी करत बाहेर पडून वेगळया पक्षाची स्थापना केली,त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले पिताश्रीं यांनी नेमके काय केले होते याचेही उत्तर तुम्ही अगोदर जनतेला द्यावे, तसेच उठाव आणि बंडळी यातला फरकच ज्यांना कळत नसेल अशा बालिश निष्क्रीय तसेच जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारी आहे का,असा प्रतिसवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिले आहे.

                प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काहीच काम शिल्लक नसलेल्या मंडळी हया केवळ प्रसिध्दीसाठी मोठया आवेषात बेताल वक्तव्य करत असून त्यांचे कार्यकर्ते टिकून रहावे म्हणून त्यांची करमणूक करण्याचा हा प्रकार असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनता याकडे गांभीर्याने नक्कीच बघणार नाही. कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये या निष्क्रिय नेतृत्वाने तालुक्यातील जनतेला माझे प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांची खोटी पत्रके काढून निव्वळ करमणूकीचा खेळ केला. त्यामुळे आपण केलल्या करमणूकीमुळे आपल्या सोबत किती जनता आहे हे येणाऱ्या काळातच कळेल. केवळ मोठया नेत्यांची नावे घ्यायची आणि त्यांचे नावे पत्रक काढून लोकांची दिशाभूल करायची हा प्रकार तालुक्यासाठी नविन नाही.अशा प्रकारे केलेला प्रयत्न तालुक्यातील सुज्ञ जनतेने त्यावेळी हाणून पाडला आहे हे ही चांगलेच ज्ञात आहे. निवडणूक आली की वाडयाच्या बाहेर पडायच आणि जनतेमध्ये दिशाभूल करणे हा तुमचा एककल्ली कार्यक्रम आता तालुक्यातील जनतेला चांगलाच माहिती झाला आहे,मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील गावे व वाडया वस्त्यांच्या प्रलंबित विकास करण्याचा नेहमीच प्रयत्नशील असून गावां-गावांमध्ये विकासाची कामे सध्या सुरु आहेत. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये मतदारसंघातील आम जनतेने नेहमीच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिले आहे. निष्क्रीय असणाऱ्या नेतृत्वाला बाजूला करत सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादानेच आपला दोनदा मोठया फरकाने पराभव केला आहे. दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या व ग्रामपंचायतीच्या फंडातून पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजनासाठी जाण्याची आजपर्यत वेळ आली नसून मतदारसंघामध्ये मंजूर असलेल्या विकास कामांची भूमिपूजने ही विभागा-विभागातील गावा-गावातील माझे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत.त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाची कामे सुरु आहेत की नाही हे झोपेचे सोंग घेत असलेल्या व काविळ झालेल्यांना दिसणारच नाहीत. परंतु सर्व सामान्य जनता मताच्या रुपाने नक्कीच याचे उत्तर येणाऱ्या काळात देईल.समोरा-समोर येण्याचे आव्हान देताना आपण ज्या आवेशात बोलत आहात किमान आपण आपली राजकीय उंची तपासून अशा प्रकारची वक्तव्य करावीत. आणि समोरा समोर येण्याचे आपण जे आव्हान करत आहात ते आम्ही यापूर्वीच आपल्याला केले आहे.आपणच ठिकाण तारीख व वेळ सांगा जरुर समोरा समोर येऊन दूध का दूध व पाणी का पाणी केले जाईल.ज्या धनशक्तीचा उल्लेख केला ती कोणाकडे आहे व तालुक्यात निवडणुका आल्या की त्याचा वापर तुमच्याकडून कसा होतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे.त्यामुळे धनशक्ती कोणाकडे आहे व जनतशक्ती कोणाकडे आहे वेगळे सांगण्याची गरजच नाही. गेली दोन अडीच वर्ष जे अज्ञात वासात होते ते आता निवडणुका डोळयासमोर ठेऊन कार्यक्रम कोणता आहे आणि आपण काय बोलतो याचेही भान विसरलेल्या मंडळींना जनताच धडा शिकवेल असा टोला शेवटी त्यांनी प्रसिध्दीपत्रकांत लगावला आहे.