दिवाळी असतानाही पालकमंत्री शंभूराज देसाई शेतकऱ्यांच्या बांधावर


सातारा|कृष्णाकाठ वृत्तसेवा : दिवाळी असतानाही पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेती पिकाची पाहणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील तारळे, पांढरवाडी, काटेवाडी, धनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले .33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त पिकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे श्री देसाई यांनी यावेळी सांगितले .

     या शेतपिक पाहणी वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय कुमार राऊत, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी श्री. देसाई म्हणाले अतिवृष्टीने 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त झालेल्या शेतपिकांचे चार दिवसात वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल . हे पंचनामे चार दिवसात पूर्ण होण्यासाठी महसूल कृषी यांच्यासह विविध विभागांचा सहभाग घेऊन वेगवेगळी पथके तयार करण्यात यावी.दिवाळी असून ही पालकमंत्री आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर आहे.जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.



_____________________________
एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
    आज दिवाळी असूनही जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत त्यानुसार जिल्हा प्रशासन काम करीत आहे. हे शासन सर्वसामान्याचे शासन असून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही त्यांना शासन नक्की दिलासा देईल असे आश्वासनही श्री देसाई यांनी पाहणी दरम्यान दिले
_____________________________