लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 49 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा आज दौलतनगर मरळी येथे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कारखान्याच्या 11 ज्येष्ठ शेतकरी सभासदांच्या हस्ते यंदाच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. यावेळी मा. स्मितादेवी शंभूराज देसाई वहिनीसाहेब, यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराजदादा देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराजदादा देसाई उपस्थित होते.
यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थित सर्व सभासद आणि शेतकऱ्यांना संबोधित केले. गेल्या पाच दशकांपासून पाटणमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी कारखान्याचे ऋणानुबंध आहेत. कारखान्याच्या आधुनिकीकरणाची, विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यंदाच्या हंगामात अपेक्षित उद्दिष्ट कारखान्याने गाठावे, अशा शुभेच्छा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिल्या. तसेच कारखान्याचे कर्मचारी व सभासद शेतकरी यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेतले जातील आणि आदर्श कार्यपद्धतीचा वस्तुपाठ राज्यासमोर ठेवला जाईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी गतिमानतेने निर्णय घेतले जात आहेत, असे ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. नियमित पिककर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीही सरकार संवेदनशीलतेने निर्णय घेत आहे. पाटणमधील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी 16 कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल सरकारने उपलब्ध करून दिले आहे. विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम सध्या पूर्णत्वाकडे गेले आहे. आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगतिले. सभासदांनी आपला पिकविलेला सर्व ऊस गळीतास देऊन हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कायम दक्ष आहे, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी नेरळे गावचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोर्गे (पैलवान बापू) व निवडे गावचे श्री. बबनराव उर्फ बाबाजी रामचंद्र पाटील (बापू) यांची निवड ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यशराजदादा देसाई यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. पांडूरंगभाऊ नलवडे, संचालक श्री. सर्जेराव जाधव, कार्यकारी संचालक श्री. सुहास देसाई, श्री. अशोकराव पाटील, श्री. प्रशांत पाटील, श्री. शशिकांत निकम, श्री. सुनील पानस्कर, श्री. बळीराम साळूंखे, श्रीमती जयश्री कवर, श्री. विजय सरगडे, श्री. शंकरराव पाटील, श्री. भागुजी शेळके हे संचालक, तसेच शेतकरी, हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते व कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.