"अवयवदान चळवळीला जनजागृतीची गरज"


पुसेसावळी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
भारतीय संस्कृतीमध्ये दानाच्या महात्म्याचे अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहे. पुराणकथांमध्येही गोदान, भूदान, वस्त्रदान आदी दानांचे वर्णन आहे. आपणही रोजच्या जीवनात मंदिरापासून रस्त्यावरील भिकाऱ्याला दान करतो. दान केल्याने दात्याला समाधान मिळते; तसेच गरजवंताचीही गरज पूर्ण होते. पर्यायाने दोन्ही जीव समाधानी होतात. दानाने पुण्य लागते, असेही समजले जाते. असे असले तरी मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याबाबत आजही समाजात उदासीनता दिसते. अवयवदान केल्यास एखाद्या व्यक्तीस गरजू रुग्णास नवे जीवन लाभू शकते. त्यामुळेही पुण्य मिळू शकते; पण अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज, धार्मिक पगडा आदी बाबींचा अडसर असल्याने अनेक जण त्यासाठी पुढाकार घेत नाहीत. हे गैरसमज दूर होऊन अवयवदानाबाबत समाजात जागृती व्हावी, यासाठी सरकार, तसेच सेवाभावी व्यक्ती संस्थांनी केलेले प्रयत्न तोकडे पडत आहेत,अवयवदान ही काळाची गरज असुन त्याबाबत मोठया प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे.

आज 13 ऑगस्ट जागतिक अवयव दान दिवस जगभरात विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे,

परंतु अवयवदानासाठी ग्रामीण खेडयांपासुन ते शहरी भागापर्यत मोठ्या प्रमाणावर व्यापक जनजागृतीची गरज आहे. अवयवदानाबाबत सरकार तसेच व्यक्ती- विविध संस्थांकडून अवयवदानाबाबत जनजागृजी होत असली, तरी देशात नेत्रदान व देहदान या पलीकडे त्याविषयी जागरुकता कमी प्रमाणात झाली आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, हृदय, किडनी, यकृत व इतर अवयव दान करता येतात. त्याचा वापर असे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना होतो, याबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अववदानाबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे. अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी व अवयवांची व्यावसायिक आणि अवैध विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ लागू केला. सध्या देशभरात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत व २००० हून अधिक हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात रोजच्या रोज वाढ होतच आहे.

राज्यातील जनतेचे अवयवदानाबाबत प्रबोधन करुन जास्तीत जास्त दात्यांना संपर्क करुन समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग करतच आहे. त्या अनुषंगाने महा अवयवदान जागृती अभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मार्गदर्शन करण्यात येते. या मोहिमेद्वारे राज्यभरातून जास्तीत जास्त अवयवदानाच्या नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबत समाजाच्या विविध स्तरामध्ये अवयवदानाचे महत्व रुजविण्याचे काम केले जात आहे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, शासकीय,खासगी वैद्यकीय महाविद्यालये, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक,अधीक्षक उपजिल्हा, कुटीर, रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी,स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

 धडधाकट माणसे अपघातात मृत्यू पावतात. कुणाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. कुणाचा मेंदूमृत होतो, अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्याशिवाय मोठे कार्य नाही. मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारानंतर शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही.अवयवदानाच्या चळवळीत झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी सेंटरची भूमिका महत्त्वाची असते. एखादा पेशंट ब्रेनडेड झाल्यावर झेडटीसीसीचे स्वयंसेवक हॉस्पिटलमध्ये जाऊन अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगतात. ब्रेडडेड पेशंटची किडनी, लिव्हर, नेत्र असे अवयव मिळाल्यास दुसऱ्या पेशंटला नवीन जीवन मिळते.म्हणुनच सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करुन देशात विज्ञानाच्या साथीने ही चळवळ यशस्वी करुन गरजुंचे आयुष्य उजळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

कोणत्या अवयवांचे दान करता येते?

जिवंतपणी करता येणारे: रक्त, त्वचा व यकृत, दोन मूत्रपिंडापैकी एका मूत्रपिंडाचे दान

मृत्यूनंतर करता येणारे: नेत्रदान व त्वचादान.

‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केल्यानंतर: नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा,फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे दान होऊ शकते.

________________________________

"मृत्यूनंतर शरीरावर अग्निसंस्कार,दफनविधी होवून अवयवांची राख करण्यापेक्षा अवयवदान करुन अनेकांचे जीवनात आनंद मिळवून देणे हेच श्रेष्ठ काम आहे."मरावे परी देहरुपी उरावे"हा

विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगून अवयवदान जनजागृतीस पुढाकार घेवूया..."

अविनाश काशीद-अवयवदान समुपदेशक

________________________________