मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्थगित


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही मोठी घोषणा केली. झेडपी सदस्य संख्येच्या बदलाच्या निर्णयामुळे निवडणूक स्थगित झालेली आहे. सदस्य संख्येच्या अंमलबजावणीसाठी वेळ लागणार असल्याने हे स्थिती देण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने परित्रक जाहीर करत निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केला होता.

या बदलानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. सध्याचे मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्‍य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.

सध्या 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर 13 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली आहे.

निवडणुकी संदर्भात पुढील आदेश देण्यात येतील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती दिली आहे.