नवभारत पतसंस्था व संजिवन प्रतिष्ठानच्यावतीने दहावीतील गुणवंतांचा गौरव

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

 नवभारत पतसंस्था मुख्य कार्यालय ता. पाटण या ठिकाणी धामणी जिल्हा परिषद गटातील विविध विद्यालयातील एस. एस. सी परिक्षा मार्च २०२२ मध्ये विद्यालयात  प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह शिल्ड, अभिनंदनपर पत्र आणि पेन देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ सभापती व नवभारत पतसंस्था, तळमावले आणि संजिवन प्रतिष्ठान, कुंभारगाव संस्थापक अध्यक्ष संजय देसाई, महेश ताईगडे, राजाराम शिबे, दादासाहेब शेडगे, रामचंद्र सुर्वे, रवींद्र बुरसे, शारदा पुजारी, सुवर्णा खटावकर, साधना मस्कर यांच्या उपस्थितीत या यशस्वी विद्यार्थाचा व त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ सभापती श्री. संजय देसाई 

यावेळी संजय देसाई यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, येणाऱ्या भविष्य काळात देखील स्कुलचे, गावाचे आणि आई वडीलांचे नाव मोठे व्हावे आणि पुढील काळात काही मदत लागली तर सदैव आम्ही आपल्या पाठीशी आहोत असा शब्द दिला. तसेच दादासाहेब शेडगे यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पतसंस्था व संजिवन प्रतिष्ठान यांनी जो आमचा सत्कार करून आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानले. धामणी जिल्हा परिषद गटातील श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव, नवभारत इंग्लिश मेडियम स्कुल, कुंभारगाव, श्री नाईकबा विद्यामंदिर, तळमावले, न्यु इंग्लिश स्कुल खळे, कुठरे, धामणी व काळगाव इ. विद्यालयातील पहिल्या तीन विद्यार्थाना बोलावून गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी केले. आभार प्रज्योत मोरे यांनी मानले. हा कार्यक्रम व्यवस्थीत पार पडण्यासाठी अमोल माने व विविध शाखेचे शाखा प्रमुख आणि स्टाफ व कर्मचारी या सर्वांनी चांगले नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.