नवभारत नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौरभ देसाई तर व्हा.चेअरमनपदी महेश ताईगडे यांची बिनविरोध निवड .

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
नवभारत नागरी पतसंस्था मर्या.तळमावले संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या बैठकीत चेअरमनपदी सौरभ देसाई तर व्हाईस चेअरमनपदी महेश ताईगडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून गणेश देशमुख होते.

          नवभारत नागरी पतसंस्थेची संचालक मंडळ निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. पदाधिकारी निवडी साठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीत निवडी पार पडल्या. यावेळी सौरभ देसाई यांची चेअरमन म्हणून तर व्हा.चेअरमन म्हणून महेश ताईगडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

           यावेळी नुतन संचालकांचा व निवडणूक निर्णय अधिकारी यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश जाधव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण,अर्थ व क्रीडा सभापती संजय देसाई , नायर व अमोल माने हे उपस्थित होते. 

          यावेळी उपस्थितांशी बोलताना नूतन चेअरमन सौरभ देसाई म्हणाले की सर्व संचालकांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य केले सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पतसंस्थेच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील नवभारत पतसंस्था नेहमीच कर्मचाऱ्यांच्या अविरत सेवेत कार्यरत आहे. आदर्श कारभार करून नवनवीन योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सौरभ देसाई म्हणाले. 

            नूतन व्हा चेअरमन महेश ताईगडे म्हणाले की आमची पतसंस्था खऱ्या अर्थाने जनसामान्यांची कामधेनू आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना मोठी मदत झाली आहे. आम्ही सर्व संचालक एकत्रितरीत्या चांगले काम करून दाखवू संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करु असे सांगितले.

              यावेळी संचालक राजाराम शिबे,शारदा पुजारी, महादेव वरेकर, रवींद्र बुरसे, विशाल शिबे, साधना मस्कर, सुवर्णा खटावकर,अपेक्षा कांबळे, रमेश गुरव व रामचंद्र झोरे असे संचालक मंडळ उपस्थित होते.

              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सचिन पुजारी यांनी केले व आभार रमेश बावडेकर यांनी मानले . कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, शाखा प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.