येळेवाडीत भरवस्तीतून बिबटयाने बकऱ्याना पळवून नेले


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथून काल (दि.15 रोजी) रात्री 12.30 ते 1.00 च्या सुमारास बिबटयाने साडेतीन महिन्याची दोन बकरी नेवून ठार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण हरीबा येळवे यांचे राहत्या घरापासून काही अंतरावर गोठा आहे. या गोठयात एक म्हैस, एक गाय, एक शेळी आणि दोन बकरी अशी जनावरे होती. सकाळी गोठा साफसफाई करण्याच्यावेळी गेल्यानंतर गोठयामध्ये दोन बकरी नसल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी इतरत्र शोधाशोध केली परंतू दोन बकरी कुठेच आढळली नाहीत. परडे नावाच्या शिवारात बकऱ्याची आतील आतडी पडलेली तसेच बिबटयाच्या पावलाचे ठसे उमटलेले दिसून आले. तसेच गोठयातील म्हैशीने देखील यावेळी झटापट केल्याचे आढळून आले आहे. म्हशीच्या गळयातील कंठा तुटून पडला आहे. त्यामुळे बिबटयाने बकऱ्याना नेत असताना प्रतिकार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे  लोकांच्यामध्ये एकच घबराट उडाली आहे.

एरवी रानामध्ये चरावयास सोेडलेल्या जनावरांवरती बिबटयाने हल्ला केल्याच्या घटना कळत होत्या. परंतू गावामध्ये येवून घरातून, गोठयात बिबटयाचा वावर वाढला असल्याने वनविभागाने अशा घटनांकडे गांभीर्याने पहावयास हवे आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.

विभागातून प्रत्येक आठवडयातून एकदा तरी बिबटयाने हल्ला केल्याची घटना घडल्याचे वारंवार घडत आहे. त्यामुळे ढाराढूर झोपलेला वनविभाग अशा घटनांवर काय कार्यवाही करणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.