खा.श्रीनिवास पाटील यांनी घेतले पाल येथील खंडोबा देवाचे दर्शन.

कोरोना व अतिवृष्टीच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी बळ द्यावे खंडोबा चरणी साकडे.










उंब्रज : कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार गुरूवारी घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहेत. त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता.कराड) येथील श्री.खंडोबाचे मंदिर देखील भाविकासांठी खुले करण्यात आले. पहिल्या दिवशी खा.श्रीनिवास पाटील यांनी पाल येथे दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर पाडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्याठी नागरिकांना बळ द्यावे अशी प्रार्थना त्यांनी श्री.खंडोबा चरणी केली.
    खा.श्रीनिवास पाटील यांनी पाल येथील श्री.खंडोबा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. अनेक दिवसानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी खंडोबाचे दर्शन घेऊन कोरोनाचे संकटातून कायमस्वरूपी सुटका करावी. तसेच कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गासह नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यातून सावरण्यासाठी बळ द्यावे अशी प्रार्थना खंडोबा चरणी खा.पाटील यांनी केली.
दरम्यान खा.श्रीनिवास पाटील यांनी  जिल्हावासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये एकाचवेळी गर्दी करू नये.करोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शिस्त व सुरक्षितता बाळगून आपली जबाबदारी सर्वांनी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी पाल देवस्थानचे विश्वस्त देवराजदादा पाटील, सर्जेराव खंडाईत, बाबासो शेळके,संजय काळभोर, धनराज गुरव जयवंत खंडाईत, प्रसाद गुरव आदी उपस्थित होते.