उद्योजकांनी नव उद्योगासाठी प्रयत्नशील रहावे : विक्रमसिंह पाटणकर

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : तालुक्यात उद्योजकांनी नव नवीन उद्योग व्यवसायासाठी प्रयत्नशील राहून रोजगार निर्मितीला चालना द्यावी. तालुक्याचा भौगोलिक विचार करून नव नवीन उत्पादने उत्पादित करून उद्योगात यशस्वी भरारी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.

म्हावशी फाटा येथे श्रीराम सेवा संस्था, पाटण एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट, श्रीराम नागरी पतसंस्था व पाटण अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता व विक्री कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट पुणेचे प्राधिकृत प्रशिक्षक काशिनाथ कप्ते, अमरसिंह पाटणकर, उद्योजक राजकुमार चव्हाण, शिल्पेश गंभीरे, अर्बंन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव क्षीरसागर, हिंदुराव सुतार, दीपकराव पाटणकर, राजाभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

काशिनाथ कप्ते म्हणाले, उद्योजगतेची सुरुवात ही गरजेपासून होते. समाजाची गरज शोधून आपल्या स्वतःतील कल्पना शक्तीला वाव द्या. त्यानंतर केलेला कोणताही व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही .

सामान्य माणसांच्या विचारांची प्रक्रिया जिथे थांबते तिथे उद्योजकाच्या विचारांची प्रकिया सुरू होत असते. उद्योजकतेची सुरूवात करायची असेल तर स्वतः मध्ये डोकावून पहा. प्रत्येकात एकतरी गुण कौशल्य असते. तो गुण शोधा आणि कामाला लागा. आवश्यक ते उत्पादन पॅकिंग आणि वितरण याचा विचार करा. आलेल्या परिस्थितीप्रमाणे स्वतःत बदल घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजकुमार चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमास माधव कपिलेश्वर, लहू माने, कृष्णा शिंदे, तालुक्यातील व्यावसायिक, युवक उपस्थित होते.