एनडीआरफच्या पथाकाचे जिल्हा प्रशासनाने मानले आभार; जिल्हाधिकारी यांनी केले कौतुक

 


सातारा दि.27 (जिमाका): अतिवृष्टीमुळे कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली या तालुक्यात पुरपरिस्थिती तसेच भूस्खलन होऊन आणि दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण झालेली होती. या आपत्तीच्या काळात एनडीआरफच्या पथकांमार्फत अतिशय बहुमुल्य स्वरुपाची मदत झालेली आहे. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाने पुणे येथील 05 बटालियनचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांचे आभार मानले आहेत. या आभाराचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिले.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील मिरगाव, ढोकावळे, अंबेघर तर्फ मरळी तसेच जावली तालुक्यातील रेंगडी आणि वाई तालुक्यातील जोर व कोंढावळे या गावांमध्ये भूस्खलन होऊन जिवित व वित्तहानी झालेली होती. या ठिकाणी पुणे येथील एनडीआरफच्या पथकांमार्फत तात्काळ शोध व बचाव आणि मदत कार्य पार पडून या ठिकाणच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. तसेच मृत व्यक्तींचा शोध घेण्याचे काम हे अत्यंत कमी कालावधीत पार पडले. आपत्तीच्या कालावधीत एनडीआरफच्या पथकांमार्फत बहुमुल्य स्वरुपाची मदत झालेली आहे त्याबद्दल आज जिल्हा प्रशासनातर्फे आभाराचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आले.