मुंबईत आभाळ फाटलं चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये २८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

केंद्रातर्फे २ लाख तर राज्य सरकार तर्फे ५ लाखांची मदत.



मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईत शनिवारी रात्रभर मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाःकार माजविला. आभाळ फाटल्यागत कोसळलेल्या पावसाने २६ जुलैच्या आठवणी ताज्या केल्या. मुंबईकरांनी कालची अख्खी रात्र जागून काढल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसाने जोर धरला होता. यामुळे पावसाचा जोरदार तडाखा मुंबईच्या चेंबूर, भांडूप आणि विक्रोळी भागामध्ये दिसून आला. या मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये मध्यरात्री डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. भांडुपमध्ये वनविभागाची संरक्षक भिंत कोसळून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तब्बल २८ जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.

या तिनही ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने २ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून ,राज्य सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केले त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली.सकाळी पावसाचा जोर कमी असला तरी मोठ्या प्रमाणावर साचलेल्या चिखलामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. येथील घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामुळे नेहमीच या भागातील अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती. मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली या घरांमध्ये राहणारे लोक दबले गेले. एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, भांडूप आणि विक्रोळी या भागामघील घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले आहे. मात्र घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली असून अजूनही कुणी मलब्याखाली दबले आहे का? याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे. चेंबूर आणि विक्रोळीप्रमाणेच भांडुपमध्ये देखील अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून सोहम थोरात असं या मुलाचं नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. हा मुलगा घरात आलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी डोंगरावरचे दगड आणि माती खाली आली. स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं खरं. पण त्याचा मृत्यू झाल्याचं नंतर जाहीर करण्यात आले.