पुढील ५ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार , वेधशाळेचा अंदाज


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने थैमान घातलं. शनिवारपासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील आणखी पाच दिवस मुंबईत हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेचे प्रमुख जयंत सरकार यांनी दिली आहे. 

मागील चोवीस तासांत कुलाबा याठिकाणी 196.8 मीमी, बांद्रा - 206.5 मीमी, सांताक्रुझ 234.9 मीमी, मीरा रोड - 235 मीमी, दहिसर - 268 मीमी, भायंदर - 203 मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पुढील पाच ते सहा तासांत मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील आणखी काही दिवस कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून, जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मध्यरात्री पासुनच पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.