अनिल वायचळ यांचा ‘स्पंदन’ कडून शौर्य मानपत्राने गौरव


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तौक्ते चक्रीवादळात खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 ते 10 तास झुंज देवून घरी परतलेल्या इंजि.अनिल वायचळ यांचा ‘स्पंदन’ च्यावतीने शौर्य मानपत्र देवून गौरव करण्यात आला. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा अनोखा सन्मान केला गेला. याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सत्यम पाचुपते आणि वायचळ कुटूंबीय उपस्थित होते. दरम्यान, अनिल वायचळ यांनी अनुभवलेला थरारक प्रसंग उपस्थितांना कथन केला.

अनिल वायचळ यांनी समुद्रात दाखवलेले झुंजार धाडस तसेच सोबत असणारे सहकारी यांना दिलेला धीर यांचे कौतुक करण्यासाठी तसेच नौदलाच्या जवानांचे आभार व्यक्त करण्यासाठी सदर मानपत्र दिल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.डाकवे यांनी सांगितले. स्पंदन ट्रस्टने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपणारे 90 पेक्षा अधिक उपक्रम राबवत समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे.