किराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन


कराड  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे वाढते आकडे लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन जाहीर केला होता व त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रशासनाकडून होत होती. अश्या परिस्थितीत किराणा माल सेवा हि अत्यावश्यक सेवेत असूनसुद्धा बंद करण्यात आली यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत या समस्येचे निवारण व्हावे व किराणा मालाची दुकाने पूर्ववत सुरु व्हावी किंवा घरपोहोच सेवा तरी सुरु व्हावी यासाठी किराणा व्यापारी संघटनेने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. हे निवेदन देताना किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन मोटे, कुमार शहा, अनिल शहा यांच्यासह कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सातारा जिल्हा कायदे विभागाचे अध्यक्ष ऍड अमित जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे लॉकडाऊन कडक करणे प्रशासनाला गरजेचे होते. परंतु यामधून किराणा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळायला हवी जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरु झाल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्बधांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या हातात आहे.