टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनानं पाठिंबा द्या असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं.
'मन की बात' मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानानी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधव या ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे."
पंतप्रधान म्हणाले की, "टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण कळत-नकळत दबाव आणायचा नाही तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे."