तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : आदर्श निर्मल ग्राम मान्याचीवाडी गावाला जे यश प्राप्त झाले आहे . त्यामध्ये काकासाहेब चव्हाण कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा मोलाचा वाटा आहे . मी स्वतः सदस्य, उपसरपंच आणि सध्या गावचा सरपंच म्हणून कामकाज करीत आहे . मला घडविण्यात रा.से.योजना विभागाचे फार मोठे योगदान आहे . मान्याची वाडीला केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत, याचे सर्व श्रेय गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक , महिला वर्ग, ग्रामस्थ व तळमावले महाविद्यालयाचा रा.से.योजना विभाग यांना जाते . लोकसहभाग व समाजप्रबोधन, एकजूट याद्वारे आपण कोरोनाला रोखू शकतो याचा आदर्श निर्मलग्राम मान्याची वाडीने घालून दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील मान्याची वाडी गावाने कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही . हे केवळ जनजागृती व समाजप्रबोधन यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन मा. रविंद्र माने यांनी केले . श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांचे वतीने ' घाबरू नका, आम्ही आपल्या पाठिशी आहोत ' हा संदेश घेऊन विविध उपक्रम सुरू आहेत . या उपक्रमाला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ' माझ गाव कोरोना मुक्त गाव ' अभियानाची साथ लाभली . कोरोना संदर्भात जनजागृती व चळवळीला चालना देण्यासाठी काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने 'ग्रामस्थ व रा. से. योजना स्वयंसेवकांच्या सहभागातून कोरोना मुक्ती ' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अजय जायभाये संचालक रा. से. यो. विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते . या ऑनलाईन कार्यक्रमास तळमावले ग्रामपंचायत सरपंच सौ. शोभाताई भुलूगडे तसेच तळमावले पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, सदस्य व महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . प्रा. अजय जायभाये म्हणाले, कोरोनाच्या या महामारीत जर आपल्याला जिंकायचे असेल तर गावातील सरपंच, युवकांनी, ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे संघटन होणे गरजेचे आहे . तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावागावातील तरुणांनी समाजाला जागृत करावे . सामजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे व सॅनिटायझर व साबणाने वारंवार हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे महत्व समजावून द्यावे . 'माझे कुटुंब ,माझी जबाबदारी , 'मी माझाच रक्षक ' या उक्तीप्रमाणे सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर निश्चितच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रा.से.योजनेचे जे उद्दिष्ट आहे कि, 'घाबरू नका , आम्ही आपल्या पाठीशी आहोत' हा हेतू सफल होईल . व नक्कीच आपण कोरोनावर विजय प्राप्त करू शकतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्राचार्य डॉ. अरूण गाडे ( सदस्य ,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण, संस्था टास्क फोर्स) म्हणाले, महाविद्यालयात ढेबेवाडी भागातील सरपंच, सदस्य, व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची कार्यशाळा करुन आयोजित जनजागृतीचे धडे देता येतील . विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन लोकांच्यात सकारात्मक उत्साह निर्माण करावा. समाजाला दिशादायक ठरेल अशा स्वरूपाची कामगिरी स्वयंसेवकांनी पार पाडावी असे आवाहन केले .
यावेळी स्वंयसेवक विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन प्रमुख पाहुण्यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन पुजारी ( सदस्य, रा.से.यो विभाग ) यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी,रा.से.यो.विभाग ) यांनी केले. आभार प्रा. संभाजी नाईक ( प्रकल्प अधिकारी रा.से.यो.विभाग प्रमुख ) यांनी मानले.