कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी औषधांचा अतिरिक्त वापर टाळावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन




मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

मुंबई - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये औषधांचा अनाठायी अतिरिक्त वापर टाळायला हवा. अतिरेकी औषधांमुळे रुग्णांवर दुष्परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. म्युकर मायकोसीस सारखा आजार याच गोष्टींमुळे होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना या गोष्टीं ध्यानात ठेवाव्या,तसेच कोणीही अंगावर आजार काढू नये डॉक्टरांकडे जावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी धोका टळलेला नाही.आता तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

यावेळी मेडिकल एज्युकेशन विभागाचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. लॉकडाऊन उघडायचा की नाही यावर आपण निर्णय घेणार आहे. पण हा निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत संसर्ग वेगाने पसरत आहे. आता पावसाळा येत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. कोविड उपचारांमध्ये औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. अतिरेकी औषधांमुळे रुग्णांवर याचे दुष्परिणाम समोर येताना दिसत आहे. म्युकरमायकोसीस सारखा आजार याच गोष्टींमुळे होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना या गोष्टींचा विचार करायला हवा. यात कोविडचा रुग्ण लवकरात लवकर ओळखून त्याला उपचार देणे महत्वाचे आहे. घरी उपचार करताना या गोष्टींची जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे.

कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्याने लस घेतली का? घेतली असेल तर कोणती होती? याची माहिती आपल्याकडे ठेवा. कारण, कोणती लस किती प्रभावी आहे, याची माहिती आपल्याला मिळेल. भविष्यात १०० वर्षानंतर असा आजार आला तर हा डेटा खूप उपयुक्त ठरणार आहे. रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत का? किती प्रमाणात तयार झाल्यात? याची माहितीही आपल्याकडे असायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.




.