माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील राज्यपाल भगतसिंह कोश्यारीना भेटले

 

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा,त्यांना रेल्वेने, परिवहन सेवेच्या बस व एसटीने प्रवास करण्यास परवानगी द्या,या घटकाला विशेष विमा संरक्षण कवच लागू करा या मागणीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिफारस करण्याकरिता आज महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनात भेटून निवेदन सादर केले.          

या शिष्टमंडळात माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या समवेत अध्यक्ष एकनाथ जाधव,संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील,जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांचा समावेश होता.पहिल्या व दुसऱ्या लाॅकडाऊनच्या टप्यापासून माथाडी कामगार व अन्य घटक जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या अन्न-धान्य, मसाले,कांदा बटाटा,भाजीपाला व फळे,गॅस सिलिंडर या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची तसेच खते,खाद्य मालाची चढ- उताराची कामे करीत आहेत, त्यांच्या न्याय प्रश्नांची अनेक निवेदने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री महोदय यांना सादर केली, लाक्षणिक संप केला,रेल्वे स्टेशन समोर महाराष्ट्र व कामगार दिन आणि माथाडी कामगार न्याय हक्क सप्ताह साजरा केला,परंतु दखल घेतली गेली नाही म्हणून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारीसाहेब यांना आज भेटून माथाडी कामगार व अन्य घटकांच्या प्रश्नांचे निवेदन सादर केल्याचे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.