लसीकरणाचे वाटप व त्याचे आकडे रोज प्रसिद्ध व्हावेत - पृथ्वीराज चव्हाण





     - लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जावे. 
- ऑनलाईन प्रक्रिया सक्तीची करू नये जेणेकरून गोंधळ होणार नाही 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोना लसीकरणाबाबत सकारात्मक जागृती जनतेमध्ये झाल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले कि, लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस ज्यांचा आहे त्यांना आधी दिला जावा तसेच १८ ते ४४ वयोगटासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया केली आहे ती सक्तीची नसावी जेणेकरून सद्या जो लसीकरण केंद्राबाहेर गर्दीचा गोंधळ होत आहे तो होणार नाही. तसेच लसीकरणाबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला, उपजिल्हा रुग्णालयाला, ग्रामीण रुग्णालयाला किती लसीचे डोस दिले आहेत याची माहिती दररोज सार्वजनिक केली जावी जेणेकरून लोकांना लसीकरणाबत माहिती मिळेल व प्रशासनाला सुद्धा गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल व योग्य नियोजन करून लसीकरण प्रक्रिया सुद्धा सुरळीत पार पडेल. अश्या काही सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आ. चव्हाण यांनी दिल्या. तसेच लसीकरणाच्या नियोजनाबाबत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सुद्धा फोनवरून आ. चव्हाण यांनी चर्चा केली व त्यांनाही लसीकरण सुरळीत होणेबाबत काही सूचना केल्या. या आढावा बैठकीप्रसंगी प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, कराड तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर भरणे, स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश शिंदे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर आदी अधिकाऱ्यांसह मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, कराड शहरचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

याप्रसंगी प्रशासनाला सूचना देताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले कि, कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसीच्या डोससाठी एक नियमावली प्रशासनाने तयार करावी. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अश्यांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटासाठी जी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे त्या प्रक्रियेमुळे लसीकरणात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. या प्रक्रियेमुळे लसीकरणासाठी ज्या त्या व्यक्तीला कोणत्याही सेंटर ला नंबर येत आहे अगदी बाहेरील जिल्ह्यातील लोकांचा सुद्धा नंबर आपल्या जिल्ह्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या परिस्थितीत स्थानिक लोकांशी वाद झाल्याच्या घटना घडत आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी हि सक्तीची केली जाऊ नये अश्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना लस मिळत आहेत त्यांनी गावनिहाय काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 

लसीकरणाबाबत होत असलेला गोंधळ यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याचेही या बैठकीत निदर्शनास आले. जर शासनाकडून लसीकरणाबाबतची योग्य प्रकारची नियमावली तयार करण्यात आली तर सद्या लसीकरण बाबत जो गोंधळ होत आहे तो होणार नाही व लसीकरण होण्याची गती वाढेल. 

याचबरोबर आ. चव्हाण पुढे म्हणाले कि, दररोज जिल्ह्याला लसीचे किती डोस प्राप्त झाले त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला व शहराला कश्या प्रकारे लसींचे डोस वितरित होईल याची रोजची आकडेवारी सार्वजनिक रित्या प्रसिद्ध झाली पाहिजे. याचसोबत ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भागात जी गावे लसीकरणासाठी दिली आहेत त्या गावांना त्याच दिवशी लस दिली गेली पाहिजे अश्या सक्त सूचनाही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या.