सरकारने मासेविक्रीची वेळ दुपारी २ पर्यंत वाढवण्याची सुरेश प्रभूंची मागणी

 


मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सुरेश प्रभू यांनी कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे मासे विक्रीची वेळ ही सकाळी ७ ते ११ ऐवजी ती दुपारी २ वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.राज्य सरकारने कोरोनामुळे निर्बंध लावले असून मासे विक्रीची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत या ठेवली आहे. त्यामुळे मुंबईतील मासळीबाजार ओस पडले असून राज्यांतर्गत माशांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे कोकणातील मत्स्य उद्योग अडचणीत आला आहे. 

समुद्रकिनारा नसलेल्या बहुतांश राज्यांना कोकणातून व मुंबईतून मासे पुरविले जातात. मात्र कठोर निर्बंधांमुळे मासेविक्री मध्ये कमालीची घट झाली आहे व बाजार ओस पडले आहेत. मुंबई बंदरावर मासे खरेदीसाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, पनवेल, आदी जिल्ह्यातून आणि तालुक्यातून मत्स्य विक्रेते येतात. मात्र कठोर निर्बंधांमुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे. कारण मासे खरेदी करून परत जाण्यासाठी त्यांच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात पोहोचायला दोन ते तीन तास लागतात. तोपर्यंत ११ वाजून गेलेले असतात. अकरानंतर सक्तीने बाजारपेठ बंद केली जाते. त्यामुळे मत्स्य विक्रेत्यांना व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे हे विक्रेते मुंबईत येतच नाहीत. त्यामुळे कोकणातील मच्छीमारांचा मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. मच्छिमार आणि मत्स्य विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून मासे विक्रीची वेळ सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवावी अशी विनंती सुरेश प्रभू यांनी आपल्या पत्रात केली आहे.