कांदाटी खो-यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चकदेव, पर्वतचा विकास साधणार : खा. श्रीनिवास पाटील

 


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
    निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खो-यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकास होणे आवश्यक आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पााच्या माध्यमातून येथे विकास साधण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून याबाबत त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

    महाबळेश्वर तालुक्याच्या अतिदुर्गम कोयना-कांदाटी खो-यात चकदेव व पर्वत ही शंकराची अतिप्राचीन मंदीरे आहेत. तसेच ही ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून ही आकर्षित करत असतात. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. मात्र याठिकाणी जाण्याासाठी अतिशय अरुंद वाट असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. तसेच येथील पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून येथे आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात अशी सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हा‍ण यांना पत्राद्वारे केल्या आहेत. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्या अनुशंगाने वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आ. मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेऊन हा आराखडा अंतीम करण्यात यावा अशी सूचनाही खा. श्रीनिवास पाटील यांनी केली आहे. याशिवाय कांदाटी खो-यात उचाट ते शिंदी या कोयना अभयारण्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे मंजूरीसाठी सादर करावा अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.