मानखुर्दमधील पालिकेचे बंद रुग्णालय क्वारंटाईन सेंटरसाठी उपयोगात आणा ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष नवीन आचार्य यांची मागणी

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील कोरोना संसर्ग रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता मानखुर्द येथील लाल्लूभाई कंपाउंडमधील पालिकेची बंद अवस्थेत असलेली असलेली मॅटर्निटी होम हॉस्पिटलची इमारत क्वारंटाईन सेंटर म्हणून

उपयोगात आणावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष नवीन आचार्य यांनी पालिका सहआयुक्त भारत मराठे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.

नवीन आचार्य यांनी आपल्या लेखी पत्रात म्हटले आहे की ,लल्लूभाई कंपाउंड मधील शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेले रुग्णालय पालिकेच्या अखत्यारीत येत असून ते २०१२ पासून बंद अवस्थेत आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आवश्यक रुग्णालय आणि क्वारंटाईन सेंटर्स कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे हे ८० टक्के तयार असलेले रुग्णालय का सुरू केले जात नाही असा सवाल सामान्य करदात्यांना पडला आहे. कारण सरकार नवीन क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयासाठी करोडो रुपये खर्च करत आहे.पण इकडे दुर्लक्ष करत आहे.सध्या अणुशक्तीनगर, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भागात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक बाब बनली आहे. त्यामुळे हे बंद अवस्थेतील रुग्णालय कोरोना क्वारंटाईन सेंटरसाठी त्वरित चालू करून घ्यावे असे नवीन आचार्य यांनी म्हटले आहे.