वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत निर्बंध वाढविले ; जनतेने प्रशासनाला मदत करावे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून या अनुषंगाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करुन जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

15 मे पर्यंत लावलेला लॉकडाऊन पूर्णपणे पाळला पाहिजे, नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये. तसेच बाजारपेठेत गर्दी करुन नये. संपूर्ण कुटुंब बाधीत होण्याचे प्रमाण वाढत आहे, तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. ज्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण झाले नाही अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच ज्या नागरिकांचे पहिले लसीकरण झाले आहे, अशा नागरिकांनी दुसऱ्या डोस ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच घ्यावे. तसेच लसीकरणाचा मेसेज आल्यानंतरच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.