जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर थोडा वाढतोय, गाफिल राहू नका,काळजी घ्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


सातारा दि. 15 (जिमाका): जानेवारीच्या शेवटच्या आठवड्या पासून ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. पण नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

नागरिकांना आता कोरोना गेला असे वाटत आहे, परंतु असे काही नाही. आजही दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळावे. वयोवृद्ध नागरिकांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास नजिकच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा आपली टेस्ट करुन घ्यावी. लवकर उपचार सुरु झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड हॉस्पीटल सुरु करण्यात आले आहे. यामध्ये आत्तापर्यंत 1500 ते 1600 जणांवर उपचार करण्यात आले आहे. आज या रुग्णालयात 100 रुग्ण आहेत. तरी लक्षणे दिसल्यास लगेच टेस्ट करुन घ्यावी.

शाळा सुरु करण्यापूर्वी शासनाने व प्रशासनाने शाळा व्यवस्थापकांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. प्रत्येक विद्यार्थी मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व शाळेत सामाजिक अंतर राखले जाईल याचे पालन करावे.

        विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरुन न जाता तात्काळ टेस्ट करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.