येत्या २५ ते २७ जानेवारीला मुंबई ,ठाण्यात थंडी जाणवणार


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 राज्यात आठवड्याभरापासून थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पण आज आणि येत्या २ दिवसांमध्ये तापमानात किंचित वाढ अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. नंतर २५ ते २७ जानेवारी दरम्यान पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळाले. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.