"जेव्हा निकाल लागतो........!!"
"दरवर्षी जून-जुलै महिन्यात वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल लागतात. ज्यांना" उत्तमोत्तम"गुण मिळतात त्यांचं भारीच कौतुक होत.पेढे-हार-तुरे..फोटो.... गुलाल...वगैरे वगैरे...!!कष्टाचं चीज झाल्यावर ह्या गोष्टी होणं योग्य आणि चांगल्याच।असतात.पण.......नापास झालेले...काठावर पास झालेले.....मध्यम मार्क मिळविलेले.....हे सारे लोक बिनकामाचे....डोक्याने कमी....उपयोगी नसलेले....धरणीला जड वगैरे नसतात हो..अजिबात नाही. तसे कोणी म्हणत असेल वा समजत असेल तर पहिलं डोक्यातून ह्या"खुळचट"कल्पना काढून टाका.कोणत्याही परीक्षेतील निव्वळ गुणांवरून, त्यातील कामगिरीवरून कोण जेता...उत्कृष्ट... सर्वगुणसंपन्न ठरू शकत नाही.
मी दहावी-बारावीच्या परीक्षा दिल्या त्यावेळेस त्याचा निकाल १०जून पर्यंत लागत असे.म्हणजे १जून ते १०जून हा माझ्या व माझ्याबरोबरच्या आधीच्या व काही नंतरच्या मुलांसाठी "धाकधुकीचा"काळ असायचा.माझ्यासाठी तर जास्तच...कारण एकतर मला सगळे "हुशार"म्हणायचे...ते का व कशासाठी म्हणायचे ते मला अजूनही कळत नाही. पुन्हा १जून ला पपांचा वाढदिवस,७जून ला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस....११जून ला छोट्या भावाचा वाढदिवस .... त्यामुळे... मी परीक्षेत काय भीमपराक्रम गाजवते त्यावर घरातील हे तीन कार्यक्रम कसे साजरे होणार ते ठरणार असायचं....त्यामुळे मी जास्तच "कोमात" गेलेले असायचे.असा तो"बोर्डात"येण्याच्या काळातील आम्ही"निरागस"असामी होतो.
बोर्डात येणारी मुलं माझ्यासाठी अजूनही संशोधनाची विषय आहेत बुवा....!!मला तर तेव्हा वाटायचं...ते काहीतरी वेगळं खात-पीत असतील त्यामुळेच १००/१००....१५०/१५०..असे भारी शतक नंबरी मार्क पडत असतील बुवा...!!त्यात आमच्यावेळी "बोर्नविटा","हॉरलिक्स".....बैद्यनाथ शंखपुष्पी यांच्या जाहिराती फारच जोमात होत्या. त्यामुळे हेच पिऊन ही पोर बोर्डात येतात नि मी न पिऊन येत नाही किंबहुना येऊच शकणार नाही असे घरात मी जाहीर करून टाकले होते.ह्यावर..."कस होणार माझ्या लेकीचं... अस म्हणून आईने डोळ्याला पदर लावला होता."हे मला अजूनही लख्ख आठवते......!!
मग बोर्नविटा आणली गेली,ती दुधात घालून प्यावी लागते नि माझं नि दुधाचं भलतंच वाकड म्हणून मी ती कोरडीच खात असे.तीच गोष्ट "शंखपुष्पी"ची त्याची विचित्र चव मला १चमचा पिताच आवडली नव्हती. त्यामुळे ती बाटली कायमची बंद झाली.आणि त्यामुळेच मी बोर्डात आले नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या बर का....!!त्यात माझा काही दोष नाही. अशा गोष्टी घडतात म्हणून "मोठी माणसं"अपयशाच्या खड्ड्यात पडतात बर का असो....!!सगळ्या जगाचं आधी भलं झाले पाहिजे मग आपलं भलं होत ह्या आईच्या शिकवणीनुसार मी म्हंटल....तुम्ही बाकी सगळे बोर्डात या....मी मागे राहते....माझं तुमच्या मागून भले होईल असे मीच त्यावेळच्या "बोर्डाच्या यादीतील सगळ्यांना"सांगितले होते.म्हणून मी मागे होते त्यांच्या....!!हे पण सर्वांनी नीट समजून घ्या...!!
आता राहता राहिली गोष्ट शेजारी-पाजारी,गावाकडची म्हातारी,मामा-मामी,काका-काकू,आत्या-मामा,चुलत काका,आत्ये मामा,आईकडील सगळे नातेवाईक (त्यांच्या नातेवाईकांचे नातेवाईक),वडिलांकडील नातेवाईक(त्यांच्या नातेवाईकांचे नातेवाईक),भावकी-गावकी,सगे-सोयरे,इकडचे-तिकडचे,छोटे-मोठे, ओळखीचे -अनोळखी,जोडलेले-तोडलेले,शाळेतील-दुसऱ्या शाळेतील,क्लास मधील,शिकवणीतील,मित्र-मैत्रिणी,गल्लीतील-दिल्लीतील.....असे अनेकजण असतात ज्यांना आपण "निकालाच्या दिवशी"चांगलेच आठवत असतो. नि अमक्या-तमक्याच्या मुलाचा-मुलीचा आज १०वी-१२वीचा निकाल आहे न??काय झाले असेल विचारा म्हणून घातल्या जाणाऱ्या चकरा, फोनवर फोन.....माझ्यासारख्या अनेक "निरागस" कोवळ्या जीवांनी त्यांच्या आयुष्यात एकदातरी नक्कीच अनुभवला असेल.मार्क्स खूप पडले तर... होणाऱ्या चर्चा (ज्यात आनंद,अभिमान,चांगली भावना यासोबतच कुत्सितपणा,जळाऊ वृत्ती,खेकडा प्रवृत्ती या सगळ्यांच एक चमत्कारिक मिश्रण असायचं नि असतच)
मला अजूनही ह्या मागचं "लॉजिक" कळलंच नाही. आपल्या निकालाचे आपल्यापेक्षा "ह्या"जगाला का बरं" कौतुक"अन "उत्सुकता"असते ते??बर त्यात चांगलं व्हावं,भलं व्हावं असे म्हणणारे असतात हे मी अजिबात नाकारणार नाही.पण,उगाच ज्यांना काही त्यातलं कळत नाही पण,उगाच टीका,जहरी वाकबाण टाकणे(टोमणे हो!!)आपल्या पेक्षा ह्यांची पोर शिकली,पुढे गेली असे म्हणत "चरफडत"राहणं... ह्याला काय म्हणायचं मग?त्यातही जात-पात-धर्म-परंपरा घुसडणं म्हणजे लैच भंपक...!!
मी दहावी झाले तेव्हा, बालपणापासून माझ्याशी "स्पर्धा"ठेवणाऱ्या एका "मैत्रिणीच्या????"आई-वडिलांनी सरळ माझ्या घरी फोन करून तुमच्या मुलीला किती टक्के मिळाले हे विचारायचं सोडून,त्यांच्याशी" घरोबा"असणाऱ्या एका "काकांना" फोन करून त्यांना माझ्या "गुणांचे" समीकरण.... सोडविण्याची कामगिरी सोपवली होती. आता मला ती गोष्ट फारच हास्यास्पद वाटते.पण तेव्हा "कोवळ्या" वयात माझ्या मनाला ती गोष्ट फारच लागली होती नि खोलवर काळजात आजतागायत रुतून बसली आहे. नि व्यक्ती"डोक्यात".विशेष म्हणजे,"त्या"मुलीने म्हणा किंवा "मी"मोठे झेंडे गाडले नाहीत की कुठे "भव्यदिव्य" कार्य अजून तरी केले नाही. मग कशासाठी ब्वा...हे खेळ खेळत होते कोण जाणे...विशेष म्हणजे अजूनही "फेसबुकवर" मला "जुडून" देखील त्याच सो कॉल्ड "अहंकारात"बुडून आहेत.but, i dnt care...करा स्पर्धा....!!
विशेष म्हणजे आता ते गुणवत्ता यादी,बोर्डात नंबरात येणं.... त्यासाठी आई-वडिलांच्या जीवाला घोर लागण ....त्यासाठी २,४वर्ष सतत अभ्यास एके अभ्यास, अनेक शिकवण्या,भरमसाठ फी,फिरणं-टीव्ही बघणं-सण-समारंभ-इतर छंद यांना फाटा दिला जायचा. सगळीकडे एकप्रकारचे उदासीन वातावरण भरून राहायचं.अनेक कोवळ्या मनांवर अपेक्षांचे मोठे "जु"ठेवले जायचे.ह्या सगळ्या आशा-अपेक्षा अन स्पर्धेच्या भयाण विश्वात अनेक"मने"भरडली जात होती.अजूनही जात आहेत.अनेक मुलांनी ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून आपले जीवही गमावले होते.पण.....एकमात्र चांगले झाले की,ही गुणवत्ता यादी लागण बंद झाले.... त्यामुळे तरी अनेक पालक, विद्यार्थी यांचे जीव टांगणीला लागण बंद झाले आहे किंबहुना प्रमाण कमी झाले आहे. हीसुद्धा सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
एकमात्र सर्वांनी करावं,आपल्या घरातील-आजूबाजूच्या , नात्यातील-मैत्रीतील वा इतर कोणीही विद्यार्थी जो दहावी-बारावीच्या वर्गात शिकायला असेल वा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अभ्यासक्रमाला असतील,स्पर्धा परीक्षा देत असतील.तर त्यांना पाठबळ देता आलं नाही, सहकार्य करता आलं नाही तरी चालेल....पण,त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं,त्यांच्या गुणांवरून -त्यांच्या परीक्षेतील यश-अपयश यांवरून त्यांना जोखण बंद करायला हवं.
माझ्या दहावी-बारावीच्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा...!!
"हारकर जितनेवाले कोही बाजीगर कहते हैं....!!"
आयुष्य खूप मोठं आहे नि खूप काही चांगलं करता येते, दहावी-बारावी वा दुसरी कोणतीही परीक्षा आपलं"आयुष्य"सर्वार्थाने घडवू शकत नाही...!!बरोबर ना?
- शुभांगी पवार (कंदी पेढा)