गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई होमपीचवरुन पाहतायत राज्याचा कारभार.


दौलतनगर दि.२६ :- सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबई,पुणे शहरातून सुमारे 74 हजार लोक आपल्या मुळगांवी परत आले आहेत.एवढया मोठया प्रमाणात लोक येवून देखील पाटण तालुक्यात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तालुक्याचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे गत दोन महिन्यांपासून रोज रस्त्यावर उतरुन नियोजन करीत आहेत त्यांच्या योग्य नियोजनामुळेच आणि सर्वांना बरोबर घेवून काम करण्यामुळेच पाटण तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे.कोरोनाच्या संदर्भातील या सर्व कार्यबाहुल्यामुळे त्यांना सलग दोन महिने मुंबईला जाता आले नाही.मंत्री म्हणून मंत्रालयात जाता आले नसले तरी ते त्यांच्या होमपिच असणाऱ्या सातारा जिल्हयातून व पाटण मतदारसंघातूनच राज्याच्या गृहविभागाचा ग्रामीण भागाचा कारभार पहात असून तो कर्तव्य भावनेतून सांभाळत देखील आहेत.गृहविभागाशी निगडीत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचे त्यांचेकडे येणारे अनेक प्रश्न ते गत दोन महिन्यात हिरीरीने सोडविताना दिसत आहेत.


             राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाईंवर गृहराज्यमंत्री म्हणून राज्याच्या ग्रामीण भागाची गृह विभागाची तसेच वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली असून वाशिम जिल्हा हा “नीती” आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला आहे.वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी लिलया उचलली असून वाशिम जिल्हयातील जनतेसाठी त्यांचे अहोरात्र काम सुरु आहे. वाशिम जिल्हयातून येणारी प्रत्येक समस्या ते पालकमंत्री व गृहराज्यमंत्री म्हणून विनाविलंब सोडविताना दिसत आहेत.


             अतिशय संवेदनशील असणारा राज्याचा गृह विभाग गृहराज्यमंत्री ना.देसाई तितक्याच संवेदनशील पणाने सांभाळत असल्याचे पहावयास मिळत आहे.राज्यातील सर्व जिल्हयातील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या फोनने आणि ब्रीफींगने त्यांचा दिनक्रम सुरु होतो.यामध्ये राज्यातील कोणत्या जिल्हयात काल काय घडले,कुठे अनुचित प्रकार घडला नाही ना,कायदा सुव्यवस्था सुस्थितीत आहे ना? गंभीर काही बाबी जिल्हयामध्ये घडल्या आहेत काय? अनुचित प्रकार किंवा गंभीर बाबी काही घडल्या असतील तर आपल्या विभागाने काय उपाययोजना केल्या? काय कार्यवाही केली ? अश्या अनेक प्रश्नावली व पुढच्यांकडून त्याची उत्तरे त्यांच्याकडे येत असतात.कुठे गंभीर प्रकार घडला असेल तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मग तेवढाच वेळ त्यांचा सकाळी असो वा दिवसभरात कधीही असो घेत असतात.ना.शंभूराज देसाई हे घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेत असल्याने प्रसारमाध्यमेही त्यांना अधिकचे प्रश्न न करता आपल्या उत्तराने आमचेही व जनतेचीही समाधान झाले असल्याचे त्यांचे प्रतिनिधी अनेकदा सांगून जातात.


              गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे होमपिचवरुन कसे धडाकेबाज काम सुरु आहे याचा अनुभव आज दि.24 रोजी नांदेड जिल्हयामध्ये शिवाचार्य महाराज यांच्या खुनाच्या घटनेवरुन पहावयास मिळाले.पाटण तालुक्यात ढेबेवाडी, कुंभारगांव विभागातील सहा गांवामध्ये मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या गांवाना भेटी तसेच गावांच्या पहाणी करण्याचा आणि येथील आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचा त्यांचा पुर्वनियोजीत दौरा होता. दौऱ्यावर जाण्यापुर्वीच त्यांनी वृत्तवाहिनीला नांदेड जिल्हयामध्ये शिवाचार्य महाराज यांचा खुन झाल्याची घटना घडली असल्याचे पाहिले तात्काळ नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना ना.शंभूराज देसाईंनी फोन लावला व काय घटना घडली आहे याची माहिती घेतली आणि तात्काळ चार टीम तयार करा जनतेमध्ये उद्रेक होण्यापुर्वी या खुन्याचा तपास लागला पाहिजे असे सांगून त्यांनी त्यांच्या पुर्वनियोजीत दौऱ्याला सुरुवात केली पहिल्या गांवामध्ये भेटीकरीता गेल्या गेल्याच त्यांना वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचे व प्रसारमाध्यमांचे फोनवर फोन येवू लागले.ना.शंभूराज देसाईंनी प्रसार माध्यमांच्या व वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना सकाळीच मी या घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले आहेत. चार टीम त्यांच्या या घटनेच्या अनुषगांने कामाला लागल्या आहेत लवकरच खुनी हाती लागेल असे सांगत होते.या विभागातील सहाव्या गावांच्या भेटीचा दौरा संपण्यापुर्वीच नांदेड पोलीस अधीक्षकांचा ना.शंभूराज देसाईंना फोन आला शिवाचार्य महाराज यांच्या खुन्याचा तेलंगणा हद्दीच्या ठिकाणी तपास लागला असून त्यांस नांदेड पोलिस यंत्रणेने ताब्यात देखील घेतले आहे व आम्ही पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु केली आहे.


              गृहविभागाची आजची ही घटना आम्ही सर्व गृहराज्यमंत्री यांच्या सोबत दौऱ्यामध्ये असल्यामुळे अनुभवण्यास मिळाली.या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारचे अनेक प्रसंग गेल्या दोन महिन्यात सातारा आणि पाटण या त्यांच्या होमपिचवरुन त्यांनी हाताळले असून गृहराज्यमंत्री गेल्या दोन महिन्यात मंत्रालयात नसले तरी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची असणारी अनेक कामे त्यांनी पाटणसारख्या ग्रामीण भागात राहून मार्गी लावली आहेत.प्रशासनातील दांडगा अभ्यास असणारा गृहराज्यमंत्री त्यांच्या रुपाने महाराष्ट्र राज्याला मिळाला असून त्यांचे आजोबा राज्याचे माजी करारी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा राज्याच्या गृहविभागात जो दरारा होता तोच दरारा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनीही निर्माण केला असल्याचे आजच्या घटनेवरुन पहावयास मिळाले.