दिल्ली येथे अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना परत आणा :आ. शिवेंद्रसिंहराजे; मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांकडे केली मागणी
सातारा: संपूर्ण जगात कोरोना साथीने थैमान घातले असून आपल्या देशातही कोरोना साथीला आळा घालण्यासाठी लॉक डाऊन सुरु आहे. दरम्यान, दिल्ली येथे एमपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे गेलेले सातारा जिल्ह्यातील ४२ विध्यार्थी तेथेच अडकून पडले आहेत. काळाची गरज ओळखून या विध्यार्थ्यांना तातडीने महाराष्ट्रात आणावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणविस यांच्याकडे केली आहे.
याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, आणि देवेन्द्र फडणवीस यांच्यासोबत ईमेलद्वारे पत्रव्यवहार केला असून संबंधित विद्यार्थ्यांची यादीही त्यांना पाठवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील ४२ विध्यार्थी एमपीसीसी परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे गेले आहेत. यामध्ये सातारा शहरातीलही विध्यार्थी आहेत. सुमारे दोन महिन्यांपासून कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला असून आपल्या देशातही या महामारीने हाहाकार उडालेला आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी आणि देशातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉक डाऊन लागू केला असून लॉक डाऊनचा तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. त्यामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंद आहेत. दरम्यान, एमपीएससी अभ्यासक्रमासाठी गेलेले सातारा जिल्ह्यातील ४२ विध्यार्थी दिल्ली येथे अडकून पडलेले आहेत. कोरोनामुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले असून दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांवर उपासमारीचीही वेळ आली आहे. या सर्व विध्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे.
सर्व विध्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने दिल्ली सरकारशी संपर्क साधून योग्य ती पावले तातडीने उचलावीत अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.
दिल्ली येथे अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना परत आणा :आ. शिवेंद्रसिंहराजे