ग्रामीण व शहरी भागात बांधकामे चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींवर दिली जाणार परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी 


ग्रामीण व शहरी भागात बांधकामे चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींवर दिली जाणार परवानगी;
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी 


सातारा दि.20 (जि.माका) : साथरोग प्रतिबंधात्माक कायदा 1897 मधील अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण व शहरी भागात बांधकामे चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील वेळोवेळी निश्चित केलेली बाधित क्षेत्र वगळून चालू असलेल्या बांधकामास काम चालू करण्यासाठी अर्जदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील. नगरपालिका, शहरी क्षेत्रामध्ये पूर्वीपासून चालू असलेली बांधकामे पूर्ववत चालू ठेवण्यासाठी परवानगी राहील. या बांधकाम कामावरील कामगार त्याठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. क्षेत्राबाहेरील कोणताही कामगार आणता येणार नाही. याकामी संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी अहवाल संबंधित प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करावे.  त्यावर संबंधित प्रांताधिकारी यांनी परवानगी देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.  ग्रामीण भागामधील चालू असलेली बांधकाम चालू करण्यासाठीच्या परवानगीसाठी अर्जदार यांच्या अर्जावरुन परवानगी देण्यात यावी. उपविभागीय अधिकारी यांनी फक्त कोरोना कालावधीसाठी चालू असलेल्या बांधकाम करण्यासाठीच परवानगी द्यावयाची आहे. बांधकामाच्या परवानगीबाबत अर्जदाराकडून 100 रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र घ्यावे व विनाविलंब चालू असलेल्या बांधकामास परवानगी द्यावी.
ज्या नगरपालिका शहरी क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत बांधकामे चालू आहे अशा ठिकाणावरील कामगार हे कामाचे आवाराच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांनी कामगार यांच्या खाण्या-पिण्याची सोय कामाच्या आवारातच करणे आवश्यक आहे. ठेकेदार यांनी बांधकामाचे ठिकाण 5 किंवा 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होणार नाही तसेच 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होईल, असे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही याची दक्षता घ्यावी. परवानगी ही आजमितीस सातारा जिल्ह्यात रहिवास असलेल्या कामगार यांच्यासाठीच असून नव्याने परजिल्ह्यातील कामगार कामावर येणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार यांची राहील. कामाच्या ठिकाणी आवश्यक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींग तसेच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.