जनधन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या घरी पोहोच व्हावे : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मागणी.


जनधन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या घरी पोहोच व्हावे व जनतेची पिळवणूक थांबवावी: ग्रामीण भागातील तमाम शेतकऱ्यांची मागणी.


उंडाळे/ प्रतिनिधी..


उंडाळे दि.सध्या लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये बँकिंग व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. ग्रामीण भागातील महिलांना 10 ते 12 किलोमीटर वरून चालत जाऊन बँकेमधील जनधन व पंतप्रधान किसान योजनेतील निधी  दिलेल्या पाचशे व 2000 रुपये काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागत आहेत. सरकारने ठरवलेल्या नियमानुसार बँकेचे वेळापत्रक सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत असल्यामुळे व त्याचबरोबर ग्रामीण भागात वाहतुकीची सोय पूर्णपणे बंद असल्यामुळे बँकेच्या ठिकाणी खातेधारकांना पोहोचण्यासाठी पहाटे लवकर उठून चालत जावे लागत आहे .कराड दक्षिण मधील डोंगरदऱ्यात राहणार्‍या जनतेची जनधन खाती उंडाळे तसेच बाजारपेठेच्या गावांमधील महाराष्ट्र बँकेत ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत.
 या आपल्या खात्यावर आलेले पैसे काढण्यासाठी गोरगरीब हातावर पोट भरणारी जनता, शेतकरी घरखर्चासाठी या पैशाची गरज लागल्याने हे पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्यासाठी पहाटेपासूनच  गावांमधून निघत आहेत. तोपर्यंत बँकेच्या बाहेर लाईन लागलेली असते. उन्हात रांगेत उभे रहावे लागते. एवढा त्रास घेऊन. सोशल डिस्टंन्स पालन करून बँकेमध्ये नंबर येईपर्यंत सदर बँकेची वेळ संपत आहे.
 व त्यामुळे परत मोकळ्या हाताने आपल्या गावाला परत चालत जावे लागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी  हेलपाटे मारावे लागत आहेत.  अशी दयनीय अवस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.अशा या ग्रामीण लोकांची फार मोठी गैरसोय होत असून याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे व या भयंकर संकटाच्या काळात त्यांचे पैसे त्यांना वेळेत मिळण्या साठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेमधून होत आहे. व लॉकडाऊन च्या काळात तरी किमान शेतकऱ्यांचे हे जनधन खात्यावरील पैसे त्यांच्या घरी पोहोचवावे अशी तमाम जनतेची प्रशासनाकडे मागणी आहे.