10 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा: जिल्हाधिकारी शेखर सिंह.

 


आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे. 10 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा: जिल्हाधिकारी शेखर सिंह.


सातारा दि. 30 (जि.मा.का):  जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत करावे तसेच गतवर्षी इतका पाऊस होईल असे गृहित धरुन तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करुन योग्य ती कार्यवाही करावी व विभाग निहाय अद्यावत आपत्ती व्यवसथापन आराखडा 10 मे पूर्वी सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या.


 नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


संभाव्य पुरामुळे होणाऱ्या स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांची यादी तयार करा अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले यामध्ये विशेषत: कराड, पाटण व वाई या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करावयाचे झाल्या यासाठी वॉर्ड निहाय ठिकाणे निश्चित करावे.  पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते अशा ठिकाणची पहाणी करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले,  नदीकाठी अतिक्रमण केलेल्या कुटुबांचे मान्सून पूर्वी नोटीस देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. 


  पावसाळ्यात दूषीत पाण्याचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. ज्या गावांचा संपर्क पावसाळयात तुटतो अशा गावांसाठी पुरेशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आधिच करावा.  अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच अन्य यंत्रणांना द्यावीत, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई, गटारी यांची साफसफाई करुन घ्यावी.  आरोग्य विभागाने आवश्यक  तो औषधसाठा, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह   यांनी शेवटी केल्या.